कोरोना संकटावर एकजुटीने मात करू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
299

(कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. बैठकीला राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेतली. सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा केली.

कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.

लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला हो,आता मे अता खेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले. यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आज करोनाशी मुकाबला करीत असताना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळला आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्स मध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधींनी सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.