मराठी कलाकारांना करायचे आहे कमबॅक: मुख्यमंत्र्यासोबत केली चर्चा

0
479

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत असला तरीही आता लॉकडाऊनच्या या काळातून टप्प्याटप्प्याने कसे बाहेर पडता येईल याचाच विचार सर्व स्तरांमधून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, नाट्य निर्माते, कलाकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे निर्माते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

यावेळी सुबोध भावे, आदेश बांदेकर, खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावली आणि आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी अनेक निर्मात्यांनी चित्रीकरण आणि पोस्ट प्रॉडक्शन सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यावर ग्रीन किंवा ऑरेंज झोन मध्ये आपल्याला दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना कसे चित्रीकरण सुरु करता येईल याचा विचार करता येईल पण त्यासाठी कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना, शिवाय चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टींचीही दखल घ्यावी लागणार असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला.

संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडीओमध्ये परवानगी द्यायची झाल्यास तेथील जागा, वातानुकुलित यंत्राबाबतही सुचना द्याव्या लागतील, असं सांगत पावसाळयापूर्वी काही चित्रीकरणे शक्य होतील का याचाही आढावा घेण्यास या चर्चेदरम्यान सांगण्यात आलं. ते पाहण्यास त्यांनी सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांना सांगितले.

मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक करणारे नाही तर लोक त्यांचे अनुकरण करतात, त्यांच्यापासून शिकतात, तुम्ही दाखवीत असलेली सुख आणि दू:ख वास्तव जीवनात शोधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या क्षेत्राचे एक महत्व आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच काही परवानगी देता येईल असे वाटत नाही.

यावेळी नितीन वैद्य यांनी माहिती दिली की, 70 हिंदी, 40 मराठी आणि 10 ओटीटी अशा 110 मालिकांची चित्रीकरणे कोरोनामुळे थांबली असून 3 लाख कामगार व तंत्रज्ञ यांची रोजीरोटीवर परिणाम झाल्याचे संगितले. 30 हजार एपिसोड दर वर्षी तयार होतात. 5 हजार कोटींची गुंतवणूक हिंदी मालिकांची तर 250कोटींची गुंतवणूक यात आहे अशी माहिती दिली. निर्मात्यांना विना तारण कर्ज तसेच कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहाना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटाना अनुदान रक्कम देणे, चित्रपट निर्मिती जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.