यंदा पिकनिकला ब्रेक: भुशी डॅमसह इतर पर्यटनस्थळांवर बंदी कायम

0
567

(जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेत पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय)

लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असताना वरुणराजा बरसू लागला, त्यामुळे पर्यटकांना पर्यटन केंद्र खुणावू लागली. पुणे-मुंबईच्या पर्यटकांनी तर त्यांच्या आवडत्या लोणावळ्याला येण्याचं नियोजन ही केलं असेल. किंबहुना सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इतर धरणांचे पर्याय ते अवलंबण्याच्या तयारीत असतील. पण यंदा त्यांचा हिरमोड होणार आहे. कारण लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असली तरी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत.

भूशी डॅमसह अनेक पर्यटनस्थळांवर बंदी 

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी असल्याचे जाहीर केले आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस होतो. मावळ तालुक्यात भुशी धरण, लोणावळ्यातील विविध पॉईंट्स, गड-किल्ले, लेण्याद्री. तसेच मुळशी तालुक्यातील मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट परिसर आणि हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण आणि गड-किल्ले परिसर आहेत. तर वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण आणि परिसरातही वर्षापर्यटनासाठी पुणे-मुंबईहून पर्यटक येतात. मुंबई, पुण्यासह बहुतांश जिल्हयातील पर्यटकांची पर्यटनासाठी या धरणांना पसंती असते. प्रत्येक वीकएण्ड आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहे.

या धरण आणि इतर भागात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. अशातच कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राम यांनी पुढील आदेशापर्यंत पर्यटनाला बंदी कायम ठेवली आहे. या आदेशाचा कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनिहाय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.