राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन

0
249

राज्यात ‘ मिशन बिगिन अगेन ‘चा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक निर्बंध मात्र शिथील करण्यात येणार आहेत. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजार रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सरकारसाठी हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला होता. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच लांबचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येणार आहे. मात्र मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं सक्तिचं असणार आहे.

राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.

सरकारने राज्यात ३१ जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यात आधीपासून लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत. राज्यात लॉकडाऊन दरम्यान जिल्हाबंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. ही बंदी यापुढेही कायम राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागात ये-जा करण्याची मुभा आहे ती मात्र कायम राहणार आहे. एसटीची मर्यादित सेवा राज्यात सुरू झाली आहे. ती यापुढेही तशीच राहणार आहे.