टाइम कॅप्सूल म्हणजे काय? काय आहे त्याची संकल्पना?

0
623

अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामाला लवकर वेग येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात भूमिपूजन केलं जाणार आहे. राम मंदिर निर्माण करताना दोनशे फूट खाली ‘टाईम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मंदिराची संपूर्ण माहिती असेल. जेणेकरून भविष्यात जन्मभूमी आणि राम मंदिराचा इतिहास दिसून येईल आणि कोणता वाद होणार नाही. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी ही माहिती दिली. यावरूनच टाईम कॅप्सूल म्हणजे काय, टाईम कॅप्सूल येते कुठून आणि त्याचं महत्त्व काय हे समजून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत.

काय आहे नक्की टाईम कॅप्सूल :

टाईम कॅप्सूलला मराठीत ‘कालकुपी’ असेही संबोधतात. टाईम कॅप्सूल हे कंटेनर सारखे असते. कॅप्सूलला बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या तांब्याचा वापर केला जातो. लांबी जवळपास तीन फूट असते. या कॅप्सूलवर कोणत्याही प्रकारच्या हवामानाचा, पाण्याचा विपरीत परिणाम होत नाही.

टाईम कॅप्सूलमध्ये महत्वपूर्ण दस्तऐवज ठेवण्यात येतात. ही कॅप्सूल एकदा जमिनीत खोल गाडल्यावर ती हजारो वर्षांनी जमिनीतून बाहेर काढली तरी त्यामध्ये ठेवलेले दस्तऐवज सुरक्षित राहतात. आगामी पिढीला गतकाळात काय घडलं होतं, याची माहिती व्हावी, हा टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवण्यामागे मुख्य उद्देश असतो! म्हणजेच भविष्यात लोकांशी संवाद साधण्यासाठी ही कालकुपी वापरली जाते. त्यामुळे पुरातत्व शास्त्रज्ञ तसेच इतिहासाच्या संशोधकांना अभ्यास करणे सोईचे ठरते. पुढील पिढ्यांपर्यंत एखादी महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी आणि भविष्यात पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांना मदत करण्यासाठी टाईम कॅप्सूलच वापर केला जातो.

टाईम कॅप्सूल हा शब्दप्रयोग 1938 मधील असला, तरी ही संकल्पना जगभरात फार आधीपासून ज्ञात आहे. स्पेनमध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये चारशे वर्ष जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती. यामध्ये येशू ख्रिस्ताच्या मूर्तीसह काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. अंदाजे 1777 च्या कालखंडातील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबत यातून माहिती मिळाली होती.

यापूर्वी सुद्धा देशात अशा प्रकारे टाईम कॅप्सूल काही महत्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे:

  • सन 1973 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यात जमिनीच्या 32 फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 25 वर्षांच्या घटना पुराव्यानिशी यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या, असे म्हटले जाते. मोरारजी देसाई यांनी त्यांच्या कालावधीत ही टाईम कॅप्सूल काढून टाकली. त्यात कोणत्या नोंदी होत्या, याचे रहस्य आजही कायम आहे.
  • एवढेच नव्हे तर आयआयटी कानपूरच्या मागील 50 वर्षांच्या इतिहासाची माहिती असलेली ‘कालकुपी’ जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सन 2010 मध्ये ही कॅप्सूल जमिनीखाली ठेवली होती. त्यामध्ये आयआयटी कानपूर ने केलेले संशोधन आणि तेथील शिक्षकांशी संबंधित असलेली माहिती ठेवण्यात आली होती.
  • चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाचीही माहिती टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे.