‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान नक्की काय आहे?

0
423

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाची घोषणा केली. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्यांची पुढील महिन्याभरात तपासणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी या योजने अंतर्गत केली जाणार आहे.

या अभियानाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. राज्यातील एवढ्या बारा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी करणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. पण ही गोष्ट सोपी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणांच्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाचं घरं शोधणं ही कठीण बाब असली तरी शक्य आहे. सरपंचापासून खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या वॉर्डाची जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र आपण व्यापता येऊ शकतो. याद्वारे प्रत्येक घराची आणि त्यातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी आपण करु शकतो. पुढील महिन्याभरात या लोकप्रतिनिधींनी किमान दोन वेळा लोकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आपली टीम पाठवावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

असे असेल अभियान

मुख्यमंत्र्यांनी या अभियानाविषयी सांगितले की, या अभियानासाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी कार्यरत असतील. तसेच त्यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी होऊ शकतात. हे लोक प्रत्येक घरामधील व्यक्तींची चौकशी करतील. या चौकशीमध्ये घरात पन्नाशीच्या पुढील किती सदस्य आहेत? त्यांची ऑक्सिजन लेवल काय आहे? यासोबतच इतर व्यक्तींना व्याधी किंवा आजाराची कोणती लक्षणं आहेत का? जर काही लक्षणं असतील तर ती शासनाच्या यंत्रणेच्या लक्षात आणून द्यायची, त्यानंतर यावर पुढील उपचार काय करायचे? हे उपचार कुठे केले जातील? या सर्वांच मार्गदर्शन केले जाईल. जसे मुंबईत ‘चेस द व्हायरस’ ही योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे आणि महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.