अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

0
172

ठाकरे सरकारमधील आणखी मंत्र्याने राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुखांनीच पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवारांनी होकार दिला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अँटिलिया स्फोटके, माजी एपीआय सचिन वाझे, मनसुख हिरेन मृत्यू आणि त्यानंतर परमबीर सिंह यांनी केलेल्या वसुलीच्या आरोपामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. यानंतर आज परमबीर सिंह यांनी केलेल्या वसुलीच्या आरोपांवर सुनावणी झाली. यात उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले. आरोप थेट गृहमंत्र्यांवर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाची निःपक्ष चौकशी होऊ शकत नाही असे यावेळी कोर्टाने म्हटले आहे. या सर्व प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या गृहमंत्र्यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अनिल देशमुख यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे.