लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर; रिक्षाचालकांच्या बँक खात्यात अखेर ‘या’ तारखेपासून जमा होणार ₹ १५००

0
188

परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून (दि. २२ मे) सुरु होत आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल.

दरम्यान, राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. ही स्थिती लक्षात घेत करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. याची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्यात रिक्षाचालकांनाही अर्थसहाय्य केले जाणार असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसारच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रिक्षाचालकांना आर्थिक मदतीसाठी राज्य सरकारकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला असल्याने, ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे. अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.