महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन: भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

0
328

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. यावेळी धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या 12 आमरादांना निलंबित करण्यात आले असून हे निलंबन एक वर्षासाठी आहे. त्यामुळे विरोधकांना ही धक्काबुक्की भोवल्याचे दिसून येत आहे. या करावाईनंतर विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार घातला आहे. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला आहे. याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी 12 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी विरोधी पक्षातील काही आमदारांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. सरकार 12 आमदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, पराग अळवणी, नारायण कुचे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम सातपुते, हरिष पिंपळे, बंटी बागडीया, योगेश सागर या बारा आमदारांची नावे पुढे आली आहेत.

दरम्यान, विधानसभेतील गोंधळानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निवदेन दिले. सभागृहातील ही घटना काळीमा फासणारी आहे. राज्याच्या इतिहासात असे कधी झाले नाही. सभागृहातील वर्तन हे लांछनासपद आहे. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. तर काही आमदारांनी राजदंड ओढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडलेले नाही, असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहात निवदेन करताना सांगितले.