टोकियो ऑलिम्पिक 2021: भारताचा ऑलिम्पिकमधील प्रवास! भारताची आजवरची उत्‍कृष्‍ट कामगिरी

0
494

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. टोकियो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आहे. भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९१२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग सन १९०० मध्ये झाला. त्यावेळी नॉर्मन प्रितचार्ड ह्या एकमेव ॲथलिटने भारतातर्फे भाग घेतला, ज्यामध्ये त्याने २ पदके मिळविली. देशाचा पहिला संघ १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाठविला गेला.

१९२० च्या संघात २ कुस्तीगीर, ३ ॲथलिट आणि मॅनेजर यांचा समावेश होता. ४ खेळाडूंमधून, फक्त फाडेप्पा चौगुले हा एकच खेळाडू मॅरेथॉन पूर्ण करु शकला. ४२.७५० किमी अंतर पार करण्यासाठी त्याने २ तास ५० मिनीटे आणि ४५.४ सेकंद अशी वेळ दिली आणि १९ व्या क्रमांकासह भारताचा पहिला ऑलिंपिक मॅरेथॉन धावपटू होण्याचा बहूमान फाडेप्पा चौगुले याला मिळाला.

आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत. बऱ्याच काळापर्यंत भारतचा पुरूष हॉकी संघ ऑलिंपिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता. १९२८-१९५६ या काळात लागोपाठ मिळविलेल्या ६ सूवर्ण पदकांसह, १९२८-१९८० या १२ वर्षांच्या कालखंडात पुरूष हॉकी संघाने तब्बल ११ पदके मिळविली.

२००४ अँथेस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोर याने मेन्स डबल ट्रॅप शूटींगमध्ये रजत पदक पटकावलं. नेमबाजीतील हे भारताचं पहिलं पदक होतं. त्यानंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. त्याने १० मीटर एअर रायफल कॅटेगरीत ७००.५ गुण मिळवत सुवर्ण पदक नावावर केलं. त्याचवर्षी सुशील कुमारनं कुस्तीत भारताला कांस्य पदक पटकावून दिलं. तसेच मुक्केबाजीत विजेंद्र सिंहने कांस्य पदक पटकावलं.

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताकडून आतापर्यंत सर्वांत जास्त ८३ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. याशिवाय भारतीय खेळाडूंनी एकूण ५५ क्रिडाप्रकारांत भाग घेतला, ही सूद्धा भारताची आतापर्यंतची सर्वांत मोठी मिळकत म्हणावी लागेल. एकूण पदकांच्या संख्येनुसार विचार केल्यास हे ऑलिंपिक भारतासाठी सर्वात जास्त यशस्वी ठरले. नेमबाजी मध्ये विजय कुमारला रौप्य पदक, ६६ किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये सुशिल कुमारला रौप्य पदक, प्रत्येकी एक कांस्य पदक १० मीटर एर रायफल नेमबाजी मध्ये गगन नारंग, महिला एकेरी बॅटमिंटन मध्ये सायना नेहवाल, ५१ किलो बॉक्सिंग मध्ये मेरी कोम आणि ६० किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये योगेश्वर दत्त यांना मिळाले

२०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताच्या पदरी फक्त दोन मेडलची भर पडली. महिला फ्रिस्टाइल ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवलं. तर पीव्ही सिंधुने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रजत पदक पटकावलं. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत काय कामगिरी करतो?, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.