घटनस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार

0
218

गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून समाधान व्यक्त
राज्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, दारुची दुकाने, मॉल्स आदी सुरु करण्यात आले. मात्र, मंदिरं बंद असल्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्य जनतेत राज्य सरकारविरोधात नाराजी वाढत होती. भाजप, मनसेसह अनेक संघटनांनी राज्य सरकारविरोधात घंटानाद आंदोलनं केली. तरिही राज्य सरकारनं मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला नव्हता. गणेशोत्सव काळातही मंदिरे बंदच ठेवण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सवानंतरच्या स्थितीचा आढावा घेत आज राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.