Pro Kabaddi League 2021: हुतूतू… आला रे आला कबड्डीचा महासंग्राम आला

0
334

कबड्डीचा महासंग्राम अर्थात प्रो कबड्डी लीगला आजपासून सुरुवात होत आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये यंदा 12 संघ खेळणार असून ग्रुप स्टेजमध्ये तब्बल 66 सामने रंगणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे प्रो कबड्डी लीग पुढे ढकलण्यात आली होती.

पहिला सामना कोणत्या संघात?
प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील सलामीचा सामना बंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ बंगळुरुमध्येच सामने खेळवले जाणार आहेत. सामन्यादरम्यान प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. त्यानंतर तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायव्हाज या दाक्षिणात्य संघांमधील झुंज रंगेल, तर तिसरा सामना गतविजेते बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यात होईल. यंदाच्या प्रो कबड्डीत चाहत्यांना तिहेरी सामन्यांची लज्जतसुद्धा अनुभवता येणार आहे. हंगामाच्या प्रारंभीचे चार दिवस व त्यानंतर प्रत्येक शनिवारी तीन सामने होणार आहेत.

टीम
सामन्याच्यादिवशी सर्व संघ जास्तीत जास्त १२ आणि कमीत कमी 10 खेळाडू संघात ठेऊ शकतात. यामध्ये एक परदेशी खेळाडू असणं आवश्यक आहे. एकावेळी सात खेळाडू सामना खेळतील. उर्वरित तीन ते पाच खेळाडूंना सबस्टिट्यूट म्हणून सामन्यात संधी मिळू शकते.

सामन्याची वेळ
एक सामना 40 मिनिटांचा असेल. यात 20-20 मिनिटांचे दोन हाफ असतील. दोन हाफ टाइममध्ये पाच मिनिटांचा इंटरवल असेल. इंटरवलनंतर दोन्ही संघांची साईड बदलली जाईल.

स्कोरिंग सिस्टिम
प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूला बाद केल्यानंतर एक-एक गुण मिळेल. ऑलआउट केल्यास दोन एक्स्ट्रा पॉईंट मिळतील.

टाइम आऊट
सामन्यादरम्यान दोन्ही संघांना विश्रांतीसाठी 90 सेकंदांचा वेळ दिला जाईल. पंचांच्या अनुमतीनंतर कर्णधार, कोच किंवा खेळाडू टाइम आऊटचा पर्याय निवडू शकतात. 40 मिनिटांमध्ये या टाइमआऊटचा समावेश नाहीय. टाइम आऊट दरम्यान मैदान सोडता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केले, तर प्रतिस्पर्धी संघाला बोनस पॉईंट मिळेल.

सामन्या दरम्यान कुठल्या खेळाडूला दुखापत झाली किंवा बाधा आली, तर मॅच रेफरी किंवा पंच टाइम आऊट जाहीर करु शकतात. याचा टीमच्या टाइम आऊटमध्ये समावेश होणार नाही.

खेळाडूंना आरामासाठी वेळ मिळणार

सामन्यात दोन्ही संघांना विश्रांतीसाठी ९० सेकंद देण्यात येणार आहेत. संघाचा कर्णधार, प्रशिक्षक किंवा कोणताही खेळाडू पंचाच्या परवानगीने हा निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर जिथे खेळ थांबला होता त्याच वेळी पुन्हा सामना सुरू होईल. त्यावेळी कोणताही संघ मैदान सोडू शकत नाही. तर नियमांचे उल्लंघन केल्यास विरोधी संघाला बोनस गुण दिले जातील.

संघ एक वेळा प्रशिक्षकांशी संवाद साधू शकतो

सामन्यातील पंच किंवा टीव्ही अंपायर खेळाडूस दुखापत झाल्यास किंवा कोणताही त्रास झाल्यास अधिकृत वेळ देऊ शकतात. संघाच्या टाइमआउटपेक्षा हे वेगळे असेल. सामन्याच्या अर्ध्या वेळेत संघाला प्रशिक्षकाशी चर्चा करण्याची एकच संधी दिली जाईल. यासाठी २० सेकंद दिले जातील.