“आश्रय” चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची टीम करतेय कौतुकास्पद काम

0
490

आश्रय’ या नावा वरूनच या चित्रपटात काहीशी हृदयाला स्पर्श होणारी गोष्ट पहायला मिळेल याचा अंदाज येतो. त्यानुसार या चित्रपटाच्या माध्यमातून एका अनाथ लहान जीवाची कथा सादर करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे…’ हे आपण कायम ऐकत आलो आहोत. याच न्यायानुसार या अनाथ जीवाला कोण आश्रय देतो, कोण त्याचा आधार बनतो, कोण त्याच्यावर मायेची पाखर घालतं या प्रश्नांची उत्तरं ‘आश्रय’मध्ये मिळणार आहेत.

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं कथानक, सुमधूर गीत-संगीत, दर्जेदार निर्मितीमूल्ये, कसदार अभिनय आणि सुरेख सादरीकरणाच्या माध्यमातून ‘आश्रय’च्या रूपात एका परिपूर्ण मनोरंजक चित्रपट देण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांसह संपूर्ण टिमनं केला आहे. या चित्रपटाचं कथालेखन अभिषेक संजय फडे यांनी केलं आहे, तर पटकथा व संवादलेखन दीक्षित सरवदे यांचं आहे. या चित्रपटात श्वेता आणि अमेय यांच्या जोडीला निशिगंधा वाड, सुनील गोडबोले, दीपाली कुलकर्णी आदी कलाकार आहेत. सिनेमॅटोग्राफीचं काम डिओपी राजू देशमुख आणि प्रथमेश शिर्के यांनी, तर संकलनाचं प्रदीप पांचाळ यांनी केलं आहे. आनंद शिंदे आणि आरती यांच्याखेरीज ऋषिकेष रानडेनंही या चित्रपटासाठी गायन केलं आहे. पार्श्वसंगीत अजिंक्य जैन यांचं आहे.

होळीच्या निमित्ताने गाणे आले भेटीला

संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत आणि अभिषेक संजय फडे निर्मित ‘आश्रय’ या चित्रपटाचं रमेश पोपट ननावरे आणि संतोष साहेबराव कापसे यांनी केलं आहे. कोरोनानंतर २ वर्षांनी होळीचा सण साजरा होणार असल्यानं सर्वांना होळी आणि धुलीवंदनाचे वेध लागले आहेत. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानंतर येणारा होळीचा सण अबालवृद्धांना एकत्र आणण्याचं काम करतो. ‘आश्रय’ या चित्रपटातही असंच एक सर्वांना ताल धरायला लावणारं गाणं पहायला मिळणार आहे. ‘सतरंगी ही दुनिया सारी…’ असा मुखडा असलेलं हे गाणं गीतकार आरती फडे यांनी लिहिलं असून, आरती यांनीच आनंद शिंदे यांच्या साथीनं गायलंही आहे. या गाण्याला सुमधूर संगीत देण्याचं काम संगीतकार विशाल बोरूळकर यांनी केलं आहे. श्वेता पगार आणि अमेय बर्वे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं कथानकात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. केवळ होळीचं एखादं गाणं हवं या अट्टाहासापायी ‘सतरंगी ही दुनिया सारी…’ या गाण्याचा समावेश ‘आश्रय’मध्ये करण्यात आलेला नाही तर या गाण्यामागं एक पार्श्वभूमी असल्याचे मतही दिग्दर्शकांनी व्यक्त केलं आहे.

आश्रय”च्या टीमने दिली माहेरला भेट

आश्रय’ या चित्रपटाच्या टिमनं माहेर या संस्थेला मदतीचा हात पुढे करत मराठी सिनेसृष्टीसमोर एक आदर्श ठेवला आहे. माहेरवासीयांसोबतच संपूर्ण दिवस घालवत या चित्रपटाच्या टिमनं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत ‘आश्रय’ची निर्मिती अभिषेक संजय फडे यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे वसलेल्या नावाच्या सामाजिक संस्थेला ‘आश्रय’ सिनेमाच्या टीमनं भेट दिली. १९९७ मध्ये सिस्टर ब्ल्यूसो कुरियन यांनी वढू बुद्रुक येथे ‘माहेर’ या समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. आंतरधर्मीय आणि जातीमुक्त भारतीय संस्था असलेल्या माहेरनं आजवर विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करत सर्वसामान्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या जवळपास १२०० जीवांचं आश्रयस्थान बनलेल्या माहेरला ‘आश्रय’च्या टिमनं भेट देत त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं. ‘आश्रय’च्या टिमनं माहेरला पंखे आणि कुकरच्या स्वरूपात भेटवस्तूही दिल्या. या प्रसंगी चित्रपटाच्या टिमनं माहेरमधील सदस्यांसोबत संपूर्ण दिवस घालवत त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि त्यांचं मनोरंजनही केलं. अनाथांना आश्रय देणाऱ्या माहेरभेटीचं औचित्य साधत ‘आश्रय’चं नवं पोस्टरही रिलीज करण्यात आलं. या कार्यक्रमाला माहेर संस्थेच्या वतीनं रमेश काशिनाथ चौधरी, विक्रम भुजबळ, प्रशांत गायकवाड, माया शेळके, तर ‘आश्रय’ सिनेमाच्या वतीनं निर्माते अभिषेक संजय फडे, गीतकार आणि गायिका आरती अभिषेक फडे आणि दिग्दर्शक संतोष साहेबराव कापसे पटकथा-संवाद दीक्षित सरवदे, कलाकार अमय बर्वे, श्वेता पगार तसेच गणेश सटाले इत्यादी उपस्थित होते.

प्रामुख्यानं मुलींच्या पालणपोषणाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या माहेरनं मुलींनी भीक मागू नये यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मुलांना सांभाळण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांसाठी माहेर ही संस्था हक्काचं माहेरघर म्हणून नावारूपाला आली आहे. अशा मुलांच्या शालेय, स्वास्थ्य, ध्यानधारणा, कला, वैयक्तीक विकास इत्यादी बाबींकडं जातीनं लक्ष देतानाच त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली आहे. स्त्रियांसाठी कार्यरत असणाऱ्या माहेरनं कौटुंबिक हिंसाचार, अविवाहित गर्भधारणा, विधवा, हुंडा यांचे बळी ठरलेल्या स्त्रियांनाही आश्रय देण्याचं मोठं काम आहे.