विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच: १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

0
338

विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन असे ११ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे.

प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत.

विधानसभेत भाजपचे १०६ संख्याबळ आहे. तर काही अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत आहेत. त्यानुसार भाजपचे ४ उमेदवार सहज निवडून येतील. मात्र, पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची व्यवस्था भाजपला करावी लागणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा अधिक मतांची गरज आहे. यामध्ये एवढ्या मतांची जुळवाजुळव करणे हे मोठे आव्हान भाजपपुढे पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आहे.

काँग्रेसचे विधासनभेतीव संख्याबळ ४४ आहे. त्यानुसार २७ मते मिळवून काँग्रेसचा १ उमेदवार सहज निवडून येईल. त्यानंतर काँग्रेसकडे १७ मते अतिरिक्त आहेत. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसला आणखी १० मतांची गरज असेल.

कोणत्या पक्षाचे उमेदवार रिंगणात

भाजपा – १) प्रवीण दरेकर, २) राम शिंदे, ३) श्रीकांत भारतीय, ४) उमा खापरे आणि ५) प्रसाद लाड

शिवसेना – १) सचिन अहिर, २) आमशा पाडवी

राष्ट्रवादी – १) रामराजे निंबाळकर, २) एकनाथ खडसे

काँग्रेस – १) भाई जगताप, २) चंद्रकांत हंडोरे