दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा विचार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
357

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तर 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहे. त्या बैठकीत विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार करोनाच प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत आधी विचार होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बिकट बनली आहे. टप्प्या-टप्प्यात फी भरण्याची मुभाही अशा पालकांना देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर जर विद्यार्थी फी भरु शकला नाही तर शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून एखाद्या शाळा प्रशासनाने वंचित ठेवल्यास, अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

11 वी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय
तर मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने 11वी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये सुरु होण्यास वेळ लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत आदेश काढले आहेत. राज्यातील सर्वच शाळांमध्ये त्यानुसार यापुढे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 50 टक्के उपस्थिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ शिक्षण पद्धतीसाठी हे निर्देश लागू असणार आहेत.