महाराष्ट्राच्या लेकींची सुरेल मेजवानी: 5 एप्रिलपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची’

0
378

प्रेक्षकांना लवकरच सुरेल मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. कारण कलर्स मराठी वाहिनीवरचा “सूर नवा ध्यास नवा” हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच येत आहे. या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते १५ ते ३० वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे. या अनोख्या पर्वात गायक मुलींना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन लाडके परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायक, संगीतकार नि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे. येत्या 5 एप्रिलपासून सोम ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता महाराष्ट्राच्या लेकी सुरांचा मंच गाजवणार आहेत.

अवधूत गुप्तेंसाठी हे पर्व खास असणार आहे कारण पहिल्यांदाच ते दुहेरी भूमिका पार पडणार आहेत म्हणजेच यावर्षी परीक्षणासोबत कार्यक्रमाचे निर्माते देखील आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, “सूर नवा ध्यास नवा” हा कार्यक्रम पहिल्या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. यंदाच्या वर्षी मात्र जबाबदारी वाढली आहे कारण, या चौथ्या पर्वाचा मी निर्माता देखील आहे. परीक्षक म्हणून मी जितक्या प्रामाणिकपणे ही जबाबदारी पेलत आलेलो आहे, तितक्याच प्रामाणिकपणे निर्माता म्हणून देखील माझी जबाबदारी मोठी आहे. आमच्या सर्वांसाठी हे पर्व अत्यंत महत्त्वाचं आहे कारण, कोरोनाच्या आव्हानाला तोंड देत हे पर्व दिमाखदार करण्याचं आव्हान संपूर्ण टीमपुढे आहे. महत्वाची बाब म्हणजे या पर्वात महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगातील सर्वच महिलांना मानवंदना देणारं हे पर्व असेल. हे पर्व महिलांसाठी विशेष असेलच पण त्यांच्या कुटुंबासाठी, त्यामधील पुरूष मंडळीसाठी देखील विशेष असणार आहे”.

कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशी कार्यक्रमाबद्दल म्हणाली, “यावेळी मुलींचं विशेष पर्व असल्याने खूपच आनंद होतो आहे… सेटवर प्रचंड उत्साह आहे . महाराष्ट्रातील तमाम मुलींना यानिमित्ताने एक नवी प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे. कलर्स मराठीचं खूप कौतुक कारण त्यांनी अशा पध्दतीचे पर्व आणले”.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना 18 वायाकॉम मराठी प्रमुख चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “मराठी माणूस खरा खुरा श्रीमंत आहे तो त्याच्या कलासक्त मनामुळे. संगीत,गाणं,नृत्य,नाट्य,चित्रपट,साहित्ययावर मनापासून प्रेम करतो तो मराठी माणूस! प्रत्येक मराठी माणूस तानसेन नसला तरी कानसेन नक्की आहे. म्हणूनच महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातील मराठी माणसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं ते कलर्स मराठीच्या “सूर नवा ध्यास नवा “ ह्या कार्यक्रमाने. यावेळचं पर्व मुलींचं विशेष पर्व आहे. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतभरातून मराठी मुलींनी या पर्वासाठी निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे.