कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात ? त्याचे महत्त्व काय आहे ?

0
630

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात कोजागरी पौर्णिमा हा एक विशेष सण मानला जातो. विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित असल्याचे दिसून येते. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो.

कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.

शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे पावसाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. चंद्र प्रकाशातील दुधामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.[