काय आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व?

0
597

कोजागिरी पौर्णिमा काय सण आहे हे आजकाल कोणाला विचारले तर नक्कीच बऱ्याच तरुणांना सांगता येणार नाही आणि ती चुकीच्या पद्धतीनेहि साजरा करतात…बरेच जण दूधात दूध मसाला टाकून गरम करून पितात…म्हणजे त्यांना वाटते कोजागिरी साजरी झाली.काही मंडळ तर हा दिवस सोडून सवडीनुसार इतर दिवशी ती साजरा करतात

आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते. कोजागिरी ही शरद ऋतुतील आश्विन महिन्यात येते. या दिवसाला कृषी क्षेत्रात विशेष महत्व दिले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सहाने साजार करतात. ही पौर्णिमा पावसानंतरची पहिली पौर्णिमा असते.

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. काही मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली, असे सांगितले जाते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतिक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर हे पदार्थ घालून देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राचे चांदणे पडतात. त्यानंतर ते दूध प्राशन केले जाते. पावसात आकाश निरभ्र नसते. परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वच्छ, निरभ्र आणि सुंदर दिसते. या निरभ्र आकाशाचा आनंद घेता यावा व त्याचे स्वागत करावे म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी पोहे व शहाळ्याचे पाणी प्रसाद म्हणून दिले जाते.