कोरोना व्हायरस: पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे

0
472

कोरोना व्हायरस मुळे सर्व जग एकप्रकारचे हादरून गेले आहे. भारतातही कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा जास्त आहे. महाराष्ट्रासाठी पुढचे पंधरा ते वीस दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करणे योग्य नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कुठलीही जागतिक साथ चार टप्प्यांत पसरते. पहिल्या टप्प्यात व्हायरसची लागण परदेशातून आलेल्या व्यक्तींकडून होते. जसं इटलीतून भारतात आलेल्या एका व्यक्तीपासून प्रथम भारतातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.

दुसऱ्या टप्प्यात या व्हायरसची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होते. यात अशा नागरीकांचा समावेश असतो जे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेले असतात.

तिसऱ्या टप्प्यात ही लागण एका समुहापासून दुसऱ्या, समुहापर्यंत पसरते आणि त्या समुहाच्या संपर्कात आलेल्या हजारो नागरिकांना संक्रमित करते. तिसरा टप्पा हा विषाणूचा प्रसार करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. या टप्प्यात विषाणू सामान्य लोकांमध्ये पसरू शकतो. विषाणू मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे साथीच्या रोगात रुपांतर होते.

चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे देशातील एका भागातून हा व्हायरस वेगाने दुसऱ्या भागात पसरु लागतो आणि मग त्याला रोखू शकणे कठीण होईल. सध्या इटली आणि स्पेन हे देश चौथ्या टप्प्यात पोहोचलेत.

महाराष्ट्रामध्ये Covid-19 सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या पदेशातून प्रवास केलेल्या लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. व्हायरस थांबविणे सध्या सरकारसाठी महत्त्वाचे आहे”, असे सांगत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्राकडे १५ दिवस आहेत. १५ दिवस कोरोनाला रोखल्यास तो तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार नाही.

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गर्दी करु नका. धोक्याची वेळ अजून आलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा. रेल्वे, बस अनावश्यक प्रवास टाळा” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. स्वत: आपण बंधन पाळली तरी लवकरात लवकर या संकटातून बाहेर येऊ शकतो असे सरकारने जनतेला आवाहन केले आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सर्वांनी प्रशासनाला मदत करून योग्य ती काळजी घेतली पाहिजे.