जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’: पंतप्रधान मोदी

0
401

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील नागरिकांना संबोधित केलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा जनतेला संबोधित केलं आहे. कोरोना व्हायरस अजून गेला नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी करणं योग्य नाही, असं सांगत पंतप्रधानांनी आज भाषणाला सुरूवात केली. यावेळी मोदींनी जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. यावेळी मोदींनी कबीर यांच्या ओळी म्हटल्या. ते म्हणाले की, ‘पकी खेती देखिके, गरब किया किसान। अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान।’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात काळजी न घेणाऱ्या लोकांना उद्देशून आवाहन केलं आहे. मोदी म्हणाले, ‘मला अनेक फोटोंमध्ये, व्हिडिओंमध्ये काही लोकं काळजी घेताना दिसत नाहीत. मास्क न वापरता किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता फिरताना दिसतात. सध्या उत्सवांचा काळ आहे. या काळात आपण स्वस्थ राहिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला देखील स्वस्थ ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला हात जोडून तुमची प्रार्थना करतो. सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा आणि वेळोवेळी साबणाने हात धुवा. जोपर्यंत कोरोनावरची लस येत नाही, तोपर्यंत आपण काळजी घेण्याच्या बाबत चालढकल करता कामा नये’, असं मोदी यावेळी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाई जनता कर्फ्यूपासून आजपर्यंत आपण खूप मोठा प्रवास केला आहे. वेळेनुसार आर्थिक गाडा हळु-हळू पुर्ववत येत आहे. आपल्यातील अनेकजण आयुष्य रुळावर आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या या काळात बाजारातही झगमगाट दिसत आहे. पण, आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, लॉकडाउन संपला आहे, पण कोरोना व्हायरस आताही आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत प्रत्येक भारतीयांच्या प्रयत्नांमुळे भारत आज ज्या चांगल्या स्थितीत आहे त्या परिस्थितीला खराब होऊ देऊ नका.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:-

  • आज देशात फॅटेलिटी रेट कमी आहे, रिकव्हरी रेट ज्यास्त आहे. अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशात 10 लाख लोकांमध्ये संक्रमितांचा आकडा 25 हजार आहे. भारतात 10 लाख लोकांमागे मृत्यू दर 83 आहे. अमेरिका, ब्राझील, ब्रिटेनसारख्या देशात हा आकडा 600 च्या पुढे आहे. समृद्ध देशांच्या तुलनेत भारताने आपल्या जास्त नागरिकांचा जीव वाचवला आहे.
  • देशात कोरोना रुग्णांसाठी 90 लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत, तर 12 हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. कोरोना टेस्टिंगसाठी 2 हजारांपेक्षा जास्त लॅब काम करत असून, यात लवकरच चाचण्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे जाईल. कोविड महामारी विरोधातील लढाईत चाचण्यांची वाढती संख्या आपली मोठी ताकत आहे.
  • ‘सेवा परमो धर्म’ या मंत्रावर चालताना आपल्या डॉक्टर,नर्स, हेल्थ वर्कर, सुरक्षा कर्मचारी निस्वार्थ भावनेने काम करत आहेत. या सर्वा प्रयत्नांमध्ये बेजबाबदारपणे वागण्याची आवश्यकता नाही. लॉकडाउन गेला म्हणजे कोरोना गेला असे नाही, कोरोना अजूनही आहे. आपल्या देशात याच्या व्हॅक्सीनवर काम सुरू आहे आणि लवकरच व्हॅक्सीन उपलब्ध होईल. तोपर्यंत गाफील राहू नका.
  • कोरोना व्हॅक्सीन जेव्हा येईल, त्यानंतर लवकरात लवकर देशातील नागरिकांना देण्याचे काम सरकार करेल. रामचरित मानसमध्ये शिक्षाप्रद गोष्टी आणि इशारेदेखील आहेत. यात म्हटले आहे की, आग, शत्रु, पाप म्हणजेच चुकी आणि आजाराला कधीच कमी समजू नका. जोपर्यंत याचा संपूर्ण इलाज होत नाही, तोपर्यंत शांत बसू नका. त्यामुळे कोरोनावरील व्हॅक्सीन जोपर्यंत येत नाही,तोपर्यंत जबाबदारपणे वागा.
  • आपण आणि आपल्या कुटुंबास सुरक्षित आणि आनंदी पहाण्याची ही सर्वांना नम्र इच्छा आहे. मला उत्साह आणि उत्साहाचे वातावरण हवे आहे. म्हणूनच मी प्रत्येक देशवासियांना वारंवार आग्रह करतो. मी माध्यमांना आणि सोशल मीडियालाला आवाहन करतो की तुमच्या माध्यमातून कोरोना जनजागृती करा. आपण सर्वांनी साथ द्या. देशवासीयांनो, निरोगी रहा, पुढे जा आणि एकत्रितपणे आपण देशाला पुढे नेऊ, नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, गुरु नानक जयंती, छठ आणि सर्व सण-उत्सवानिमित्त तुम्हाला हार्दिक अभिनंदन.