पुन्हा एकदा भिर्रर्..! धुरळा पुन्हा उडणार; बैलगाडा शर्यतीला राज्यात सशर्त परवानगी

0
258

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर आता अवघ्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बैलगाडा मालक, चालक आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यासाठी कोर्टात आणि सरकारकडे अनेकांनी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला आता यश आले आहे.

नियमांचे पालन करणार
राज्य सरकारने बैलगाडा सशर्त सुरू करण्यासाठी जोर लावला होता. याला आता सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर बैलगाडा चालक, मालक, शेतकरी वर्गातून याचे स्वागत करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा करणारे शिवाजीराव अढळराव पाटील, अमोल कोल्हे यांसह राज्य सरकारमधील विविध मंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जी सशर्त परवानगी दिली आहे, त्या नियमांचे पालन होईल, अशी ग्वाहीही देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे सुरु असलेला या खेळावर बंदी आणल्याने शेतकरी नाराज झाले होते. गेली काही वर्षे आम्ही सर्व जण बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत होतो. राज्य सरकारने मुकूल रोहतगी यांच्यासारखे अतिशय मोठे वकिल या प्रकरणासाठी उभे केले होते. आजच्या निर्णयानंतर मला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

“माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. सुप्रीम कोर्टाने अटी घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अटीशर्थींचे पालन करुन या शर्यती भरवल्या पाहिजेत आणि आनंद घेतला पाहिजे. कुठली चुकीची गोष्ट करुन परत संकट उभे राहणार नाही याची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात ही मागणी होत होती.

7 वर्षांनंतर शर्यती पुन्हा सुरू होणार

2017 साली मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे.