माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस

0
351

भारताच्या अर्थकारणाला ऐतिहासिक कलाटणी देत जगाच्या नकाशावर आर्थिक महाशक्ती म्हणून देशाला मानाचे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांचा आज वाढदिवस. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली . त्यानंतर 1962 साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली.

२६ सप्टेंबर १९३२ साली जन्मलेले डॉ. मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 या काळात भारताचे पंतप्रधान राहिले आहेत.ज्यांनी १९९० च्या दशकात आपल्या आर्थिक उदारीकरण धोरणांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर आणले. स्वतंत्र भारतच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्‍या 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते. हा काळ डॉ. सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे.

अत्यंत सौम्य प्रकृती व स्वभावाच्या मनमोहन सिंह यांना खरे तर भारतीय राजकारणातील दगदग मानवणारी नाही. तरीही केवळ सोनिया गांधींच्या आग्रहाखातर त्यांनी ही जबाबदारी २००४मध्ये स्वीकारली व तब्बल दहा वर्षे सांभाळली. या काळात काँग्रेसची देशात व अनेक राज्यांत पडझड झाली. या पराभवाला मनमोहन सिंह जबाबदार नव्हते, कारण सरकारच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटवर ते असले तरी गाडी चालवणारे हात वेगळेच होते. पराभवाचे खापर मात्र त्यांच्या माथी मारले गेले. २००४ ते २०१४ या कार्यकाळात यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. पण मनमोहन सिंग यांच्यावर कोणताही डाग उमटला नाही. मनमोहन यांच्यावर न बोलण्याचा आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण आपल्या शांत, संयमी स्वभावाने त्यांनी अनेकांची मने जिंकली.

त्यांच्या कारकीर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार(1987), भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान(1995), अर्थ मंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 व 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत. याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बून सारख्या अनेक संस्थांनी डॉ. सिंग यांना सन्मानित केले आहे. केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे . डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.

डॉ. सिंग यांनी 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषविले आहे 1998-2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली आहे. 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली व 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.