ग्रामपंचायतीसाठी भाजपचे 12 नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार

0
208

मुंबईत मंगळवारी भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. सोबतच विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकींसाठी रणनिती ठरवली गेली आहे. पक्षाचे प्रमुख १२ नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. आजही पुन्हा भाजप पदाधिकाऱअयांची बैठक होणार आहे. दरम्यान, काल झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय राम मंदिर निधी, कार्यलय निर्माण या मुद्द्यांवरही चर्चा झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे उपस्थित होते.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणनीती
येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर कोअर कमिटीमध्ये विस्तृत चर्चा झाली. यात 12 नेते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्यभर प्रचार करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. यात काही नेत्यांकडे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे. यात आशिष शेलार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुका
आगामी काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडण्यापासून ते निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यावरही चर्चा झाली. बहुतांश महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण काही ठिकाणी शक्य असेल तर स्थानिक आघाडी करुन भाजप निवडणूक लढणार आहे.

कार्यालय निर्माण
ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप भाजपचं कार्यालय नाही किंवा जागा घेतली आहे पण कार्यालय उभारणी झाली नाही, अशा जिल्ह्यांमध्ये कार्यालय उभं करण्यासाठीची रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यासाठी निधी संकलनापासून ते कार्यालय उभारणीसाठी काय करता येईल याची बैठकीत चर्चा झाली.