नको मोबाईल, नको पेन ड्राईव्ह; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांची पारंपरिक चिन्हांनाच पसंती

0
367

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या बदलत्या काळात निवडणुकीचे चिन्हही बदलत गेले. काळानुसार निवडणूक आयोगाने 90 नवीन चिन्ह दिली असली तरी मात्र निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पारंपारिक चिन्हांना जास्त पसंती दिल्याचं चित्र आहे.

निवडणूक आयोगाने लॅपटॉप , पेनड्राइव्ह, हेडफोन, एसी, सीसीटीव्ही, क्रेन, संगणक, हेल्मेट, हेलिकॉप्टर, मशीन केक, गालिचा, ब्रेड टोस्टर यासारख्या आधुनिक काळातील निवडणूक चिन्हांना मान्यता दिली असली, तरी चिन्ह वाटपात उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

अनेक उमेदवारांनी सिलेंडर, कपाट, टी.व्ही., कपबशी, फॅन, बस, शिलाई मशीन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले. दैनंदिन वापरातील वस्तूंची चिन्हे ग्रामीण भागातील जनतेच्या परिचयाची असल्याने उमेदवारांनी त्यां चिन्हांना पसंती दिल्याच चित्र आहे. बदलत्या काळाला अनुसरून यंत्रणा निवडणूक प्रक्रिया जरी हायटेक झाली असली तरी निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा चिन्हांच एक वेगळ आकर्षण ग्रामीण महाराष्ट्रमध्ये दिसत आहे.

पंचायत निवडणुकीत चिन्ह वाटपात या कपबशीला मागणी आहे. तसेच त्यासोबत छताचा पंख्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एकाच गावातील उमेदवारांनी कपबशी चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी समोर ही प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे कपबशी चिन्हावर अनेक उमेदवारांना निवडून देताना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदानासाठी तब्बल 190 निवडणूक चिन्हांची यादी जारी केलीय.