भारताच्या क्रिकेट संघाने एकजुटता ठेवावी: मोहम्मद कैफ

0
255

(कैफची माजी प्रशिक्षक चॅपेल यांच्यावर टीका)

मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने हेलो अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडले. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीय. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाहीय. 2013 नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाहीय. यातून हे स्पष्ट दिसून येतंय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे.

आमच्यावेळी सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिलेत तर बीसीसीआय सारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे. कैफ बोलला की आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटर होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.

२००० साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्यांदा परदेशी प्रशिक्षकाची नेमणूक केली. २००० ते २००५ या कालावधीत जॉन राईट यांनी भारतीय संघाला यशस्वी कामगिरी करून दाखवण्याची जिद्द दिली. पण त्यानंतर प्रशिक्षक म्हणून आलेल्या ग्रेग चॅपल यांची कारकीर्द तितकी यशस्वी ठरू शकली नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक होता? याबद्दल भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने मत व्यक्त केले.

“चॅपल हे एक उत्तम फलंदाजी प्रशिक्षक होऊ शकले असते, पण त्यांना ते जमलं नाही. त्यांना संघातील खेळाडूंशी नीट संवाद साधता आला नाही. त्यांनी स्वतःच स्वतःची प्रतिमा मलीन केली. कारण त्यांना भारतीय संस्कृती नीट समजूच शकली नाही. याउलट जॉन राईट मात्र चांगले प्रशिक्षक होते. संघातील प्रत्येक खेळाडूला ते सहकार्य करायचे. आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी गांगुलीला कर्णधार म्हणून विविध निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे संघ अनेक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला”, असे कैफने स्पष्ट केले.