२५ जून १९८३: आजच्या दिवशी भारतीय संघाने जिंकला होता विश्वचषक

0
367

25 जून म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण दिन. 3७ वर्षांपूर्वी याच दिवशी नवख्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडीजचा 1983 सालच्या विश्वचषकात 43 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद आपल्या नावे केले होते. २५ जून १९८३चा दिवशी भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा दिवस भारतीय क्रिकेट रसिक अजूनही जगतो आहे. तो दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सोनेरी अक्षराने नोंदवला गेला. १९८३ सालच्या विश्वचषकामुळे भारतीय क्रिकेटला नवीन वळण मिळाले. क्रिकेटमध्ये अनेक नवी समीकरणे उदयास आली. भारत ही क्रिकेटमधील एक सर्वार्थाने प्रबळ शक्ती म्हणून झपाटय़ाने विकसित होत गेली. त्याचे पडसाद जागतिक क्रिकेटमध्ये ही उमटले.

आतापर्यंत भारताने लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तीन वेळा विश्वचषक आपल्या नावे केला आहे. तीनही विश्वचषक भारतासाठी अविस्मरणीयच ठरले. मात्र, १९८३ साली कर्णधार कपिल देवच्या पष्ठ्यांनी जिंकलेला विश्वचषक विशेष नोंदीचा ठरला आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत. राष्ट्रीय खेळ क्रिकेट असणार्‍या इंग्लंडकडे त्यावर्षी विश्वचषकाचे यजमानपद होते. भारतातर्फे कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वखाली सुनिल गावस्कर, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमानी (यष्टीरक्षक), यशपाल शर्मा, किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील, श्रीकांत आणि बलविंदर संधू या संघाची विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. कर्णधार कपिल देवचा संघ इंग्लडला रवाना झाला. त्यावेळी ६० षटकांचा सामना असे. पहिल्याच सामन्यात भारतापुढे आव्हान होते बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचे. इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजच्या भेदक मार्‍याचा सामना करत भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात २६३ एवढी धावसंख्या उभी केली. या सामन्यात भारताकडून यशपाल शर्माने ८९ तर संदीप पाटील यांनी ३६ धावा केल्या. भारताकडून रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री यांनी भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी ३ फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यामुळे ५४.१ षटकांतच वेस्ट इंडिजचा संघ २२८ धावांवर गारद झाला. भारताने पहिला सामना जिंकत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली.विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी कपिल देवच्या भारतीय फलंदाजांना त्यांच्या गटातील वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे संघाशी कडवी झुंज द्यावी लागली.

२५ जून १९८३ रोजी क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. बेभरवशाच्या भारतीय संघापुढे मागील सलग तीन वेळा विश्वचषकाचा अंतिम सामना गाठलेल्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचे आव्हान होते. फलंदाजी, गोलंदाजी या सर्वच बाबतीत वेस्ट इंडिज संघ भारतीयांपेक्षा सरसच होता. कस लागणार होता तो भारतीय संघाचा. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत हा सामना रंगला. दूरदर्शनच्या जमान्यात थेट प्रक्षेपणाच्या गैरसोईमुळे भारतीयांचे लक्ष रेडिओवरील समालोचनाकडे लागले होते. प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाला २ धावांवर पहिला धक्का बसला. भारताचे आघाडीचे फलंदाज सुनिल गावस्कर केवळ दोन धावा करून बाद झाले. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या भेदक मार्‍यापुढे ठरावीक फरकाच्या कालावधीत भारतीय फलंदाज ५४.४ षटकांत १८३ धावा करत तंबूत परतले. वेस्ट इंडिजसमोर माफक १८४ धावांचे आव्हान होते. भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये निराशजनक वातावरण होते. हे आव्हान वेस्ट इंडिज एक हाती पार करणार अशीच कुजबूज क्रिकेटप्रेमींमध्ये होती. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या षटकातच ५ धावसंख्येवर वेस्टइंडिजचा बिनिचा फलंदाज गॉर्डन ग्रीनीजला संधूंनी तंबूचा रस्ता दाखवला. भारतीयांनी जल्लोष केला. त्यानंतर डेसमॉन्ड हायनेस, सर विवियन रिचर्ड्स यांनी वेस्ट इंडिजच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाज मदनलालच्या अचूक गोलंदाजीने दोघांनाही परतीची वाट दाखवली. अशाप्रकारे केवळ ५७ धावसंख्येवर वेस्ट इंडिजने महत्त्वाचे तीन फलंदाज गमावले. लयात आलेल्या भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा सुरूच ठेवला. त्यामुळे १८३ धावांचा पाठलाग करणार्‍या वेस्ट इंडिज संघाला केवळ १४० धावाच करता आल्या. कर्णधार कपिल देवच्या बेभरवशाच्या संघाने १९८३ चा विश्वचषक भारताच्या नावे केला. भारतीयांनी तुफान जल्लोष केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील टीम कपिल देवचे जंगी स्वागत केले. मुंबईत दाखल होताच विजेत्या भारतीय संघाची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली.

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेपुरते बोलायचे तर अस्सल कर्णधाराप्रमाणे स्वत: आघाडीवर राहून कपिलने संघाचे नेतृत्व केले. त्या स्पर्धेत कपिलने ६०.६० च्या सरासरीने एकूण ३०३ धावा केल्या, तर २०.४१ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. फलंदाजीतील सरासरीत भारतीय फलंदाजांमध्ये कपिलच आघाडीवर होता. झिम्बाब्वेविरुद्धचा त्याचा १७५ धावांचा डाव हा तर स्पर्धेतील सर्वात निर्णायक क्षण (टर्निंग पॉइंट) होता. तो डाव ‘करो या मरो’सारखाच होता. बीबीसीच्या संपामुळे दुर्दैवाने त्या सामन्याचे प्रक्षेपण झाले नव्हते.

भारतीय संघाच्या यशाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक सामन्यात वेगवेगळे खेळाडू चमकले. स्पर्धेत भारतीय संघ आठ सामने खेळला. त्यापैकी सहा सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू सामनावीर ठरले. त्यात यशपाल शर्मा, मदनलाल, कपिलदेव, रॉजर बिन्नी व मोहिंदर अमरनाथ हे होते. मोहिंदर तर अंतिम सामन्यासह दोन सामन्यांत सामनावीर ठरला. थोडक्यात, खऱ्या अर्थाने ती सांघिक कामगिरी होती. एक-दोन खेळाडूंच्या जिवावर एखाद् दुसरा सामना जिंकता येतो, पण सातत्याने जिंकण्यासाठी सांघिक कामगिरीच लागते. १९८३ च्या विजयाचा हाच खरा अर्थ होता.

1983च्या विश्वचषकनंतर भारतीय संघाने 2011 साली भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले होते