महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा : वेलॉसिटीचा ४७ धावांत गारद; ट्रेलब्लेझर्सचा ९ विकेटने विजय

0
221

युएईत महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये वेलॉसिटी संघाला खराब कामगिरीला सामोरे जावे लागले. गतविजेत्या सुपरनोव्हाजवर मात करुन स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या वेलॉसिटी संघाला दुसऱ्याच सामन्यात धक्का बसला आहे. स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्सच्या माऱ्यासमोर मिताली राजचा वेलॉसिटी संघाचा डाव ४७ धावांत संपुष्टात आला. महिला टी-२० स्पर्धेतली ही सर्वात खराब धावसंख्या ठरली.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेलॉसिटी संघाची सुरुवात खराब झाली. अनुभवी झुलन गोस्वामीने शेफाली वर्माचा १३ धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर वेलॉसिटीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. डॅनी वॅट, मिताली राज, वेदा कृष्णमुर्ती, सुषमा वर्मा अशा सर्व नावाजलेल्या फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिल्या. ट्रेलब्लेझर्सकडून सोफी एस्कलस्टोनने ४, झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी २-२ तर दिप्ती शर्माने १ बळी घेतला.

विजयासाठी अवघ्या ४८ धावांचं आव्हान मिळालेल्या ट्रेलब्लेझर्स संघाने एक विकेट गमावून डेंड्रा डॉटीन आणि रिचा घोष यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत ट्रेलब्लेझर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

एकीकडे पुरुष आयपीएलमध्ये गोलंदाज जसे चमकत आहेत तसेच महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्येही गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली आहे. भारतीय महिला आयपीएलमध्येही आता जास्तीत जास्त सामने खेळवले जावे अशी आशा माजी खेळाडूंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महिला आयपीएलही पुरुष आयपीएल प्रमाणे जगप्रख्यात होईल आणि भारताला भविष्यात जास्तीत जास्त चांगले महिला क्रिकेटर मिळतील.