महिलांच्या टी-२० क्रिकेटला हवा तसा प्रतिसाद का नाही

0
304
  • पहिल्या सामन्यात वेलॉसिटी संघाचा सुपरनोव्हासवर विजय

पुरुषांच्या आयपीएल सोबत आता महिला आयपीएल म्हणजेच महिलांच्या टी-२० क्रिकेट चॅलेंज स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासने पहिल्यादा फलंदाजी करून 127 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मिताली राजच्या वेलॉसिटी संघाने १९.5 ओव्हरमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली आणि 5 विकेटने सामना जिंकला. व्हेलॉसिटीसाठी वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा आणि सुने लूस यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये संघाला विजयी सुरुवात करून दिली.

खरं तर महिला टी २० क्रिकेटला सुरुवात जरी झाली असली तरी हवा तसा प्रतिसाद महिला क्रिकेट संघाना मिळत नाही आहे. प्रेक्षकही महिला क्रिकेटपेक्षा पुरुष क्रिकेटला जास्त प्रतिसाद आणि पाठींबा देत असतात. बीसीसीआय एवढी मोठी टूर्नामेंट भरवत जरी असली तरी महिला क्रिकेटला अजूनही हवं तसे पाठबळ मिळत नाही आहे. चार दिवसांत चार सामने आयोजित करून त्या आयपीएल महिला टूर्नामेंटला जास्त महत्त्व मिळत नाही आहे.

जशी ऑस्ट्रलियामध्ये महिला बिग बॅशला महत्त्व दिले जाते तसेच महिनाभर टूर्नामेंट आयोजित केली जाते तशी बीसीसीआय भारतीय महिला आयपीएलचे आयोजन करताना दिसत नाही आणि त्यांना हव्या तशा सुविधा दिल्या जात नाही.    मीडियामध्येही या टूर्नामेंट चा काही आढावा दिसत नाही. सामने कधी चालू होतात आणि संपतात हेही अनेक लोकांना माहित नाही आहे.

पुरुष क्रिकेटला जेवढा प्रतिसाद प्रेक्षक आणि मीडियाकडून मिळतो तोच महिला क्रिकेटलाही मिळायला पाहिजे. भारतीय महिला क्रिकेट टीमही खूप चांगल्या प्रकारे खेळ दाखवत असून त्यांना फक्त पाठींब्याची गरज आहे असे मला वाटते.

कालच्या सामन्यात व्हेलॉसिटीने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांच्या हल्ल्यासमोर सुपरनोव्हास चमारी अटापट्टू आणि हरमनप्रीत कौरने फटकेबाजीने समाधानकारक धावसंख्या गाठून दिली, पण ती विजयासाठी पुरेशी सिद्ध झाली नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीची सुरुवात खराब झाली आणि ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर डैनी व्याट एकही धाव न करता माघारी परतली. वेदा कृष्णमूर्ती एकाबाजूने लढा देत राहिली. वेदाने सुषमा वर्मासह डाव सांभाळला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. पण, वेदा राधा यादवच्या चेंडूवर 29 धावा करून झेलबाद झाली. सुषमाला मोक्याच्या क्षणी पूनम यादवने झेलबाद केले. सुषमाने 34 धावा केल्या. अखेरीस शेवटच्या ओव्हरमध्ये सुने लूस आणि शीखा पांडे यांनी व्हेलॉसिटी संघाला विजय मिळवून दिला.